Tuesday, September 10, 2013

Too busy to do good!

सकाळी सकाळी "पिंकी है पैसेवालोकी", "ताकी हो ताकी, हो ताकी ताकी ताकी रे" अशी आचरट गाणी कानावर पडली आणि दिवस सुरु झाला. मागच्या वर्षी "चिकनी चमेली", "पल्लू के पीछे छुपा के रख्खा है" या गाण्यांनी दिवस सुरु झाला होता. लोकांच्यातला सळसळता उत्साह तर काय सांगावा? त्यावर कलेची ही अशी आराधना. आणि आपली आराधना आजूबाजूच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचलीच पाहिजे, म्हणून प्रामाणिक धडपड. खूपच पवित्र वातावरण. सकाळी उठल्यापासून, ते आता पुढचे दाही दिवस अशाच भक्तीभावामध्ये न्हाऊन निघणार, या कल्पनेने मी तोंडावर पांघरूण घेऊन आणि आणखी एक तासभर झोपून घेतलो!

आपली सगळी तयारी चोख असल्याने, सकाळी सकाळी दुर्वा आणायला बाहेर जावे लागले. तिथे २ लहान मुलांची बडबड ऐकली. नुकतीच गोकुळाष्टमी झालेली. सोसायटीमध्ये लहान मुलानीपण काही बाही केलेलं. तर या दोघांची स्पर्धा सुरु होती. गोकुळाष्टमी vs गणेश चतुर्थी! त्यातल्या एकाचे स्पष्ट म्हणणे होतं की गणेश चतुर्थी म्हणजे सगळं वरवरचं असतं! गोकुळाष्टमीच जास्ती मजेशीर. असले सडेतोड मतं होऊ घातलेल्या भावी पिढी कडून ऐकून, मी उगाच आजू बाजूला घोटाळलो. "गोकुळाष्टमीला आपल्याकडे कोण आलेलं माहितीये न? आशिकी-२ मधली आरोही आलेली! माझ्या एका फ्रेंड कडे तर बिपाशा बसू आलेली! त्याच्या फ्रेंड कडे आलिया भट आलेली! मागच्या वर्षी तर सनी लिओन आलेली!" च्यायला यांना सनी लिओन कशी काय माहिती? असे विचार करून उगाच आश्चर्य वाटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाहीच झालं बुआ आश्चर्य! त्यांचे पुढे सुरूच होते, "गणेश चतुर्थीला काय? फक्त गाणीच असतात. येत कोणीच नाही! कसलं bore!" आता ही असली genuine चर्चा ऐकून मी उगाच मध्ये बोललो. "अरे, गोकुळाष्टमीला कृष्ण येतो आणि गणेश चतुर्थीला गणपती येतो! हे नाही का माहिती तुम्हाला?"

"वेडेच आहात काका. आई म्हणते. देव कायम आपल्या बरोबरच असतो!"

आधुनिकता आणि निरागसता याचा हा अनोखा मिलाप बघून मला पुढचं सुचेना. मी आपल्या दुर्वा घ्यायला निघून गेलो. नेहमीच आपल्या बरोबर असलेल्या देवाला वाहायला की खास आजच्या मुहूर्तावर भेटायला आलेल्या पिंकी किंवा चमेलीला वाहायला हे मात्र मला माहिती नव्हते.

पुढचे दहा दिवस आता गणपतीच्या मूर्तीसमोर चित्र विचित्र नाच बघायला मिळतील. जेवढी म्हणून अश्लील गाणी असतील, ती सगळी वाजतील. रस्त्यावर वाहतूक अडकून बसेल कारण गणपतीला बसायला जागा करून दिलेली असेल. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जाताना, हे सगळं सहन करत जावे लागेल. आणि असल्या कशाहीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. कारण धार्मिक भावना दुखवायचे मुद्दे वेगळेच असतात. किंबहुना, यापैकी कशाच्याही विरुद्ध बोलला, तर मात्र खूप लीकांच्या खूप काही भावना दुखावतील!

मला तर खात्री आहे गणपती दर वर्षी परत गेला की जाऊन, टिळकांना १० चाबूक मारत असेल. "ये तुने क्या कर दिया यार!" असे म्हणून!

पण हे सगळे आपलेच दात. आपलेच ओठ. आपणच वाढवलेल्या गोष्टी. आपणच दुर्लक्ष केलेल्या घटना. मग त्या आपणच सुधारावल्या पाहिजेत की.

माझ्या ओळखीचे एक आजोबा म्हणतात, "तुम्हा आजच्या पिढीला सगळ्यात काही न काही खुपत असतं! आणि मग आता तुम्ही याचा कीस पाडत बसणार. शेवटी फार फार तर मेणबत्त्या पेटवाल. त्या उपर काय कराल? एखादी गोष्टी चूक आहे म्हणून ओरडत फिरू नये. एखादी गोष्टी चूक आहे, तर बरोबर काय? ते शोधून काढावे. आणि त्याचा प्रचार करावा! हे थोडीच माहितीये तुम्हाला? चुका हुडकायच्या आणि फेसबुकवर टाकायच्या. या पलीकडे कुठे काय करता तुम्ही?"

थोडासा बदल आपणही करावाच की! जर काहीच बदल करणार नसू आपण, तर मग उगाच पुढच्या वर्षी लवकर या, असं कशाला म्हणायचं गणपतीला?

पण तो ही बिचारा येतो बापडा! पण कदाचित असं नसेल कशावरून की, गणपतीला अजून आशा असेल, काहीतरी बदल बघण्याची?

आता आपण त्याला किती काळ ताटकळवत ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून. Perhaps, we all are too busy to do good things!

गणपती बाप्पा मोरया!

No comments: